अखेर आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश; कृषी पंप धारकांना मिळणार सतत वीज पुरवठा
- आता गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारकांना मिळणार सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत सतत वीज पुरवठा
- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, व वनमंत्री यांचे आभार
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यातील कृषी पंपांची लोड शिडिंग बंद करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून आता शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सकाळी ६ वा. ते सायंकाळी ६ वा. या कालावधीमध्ये वीज पुरवठा देण्याचे निर्देश ऊर्जा मंत्र्यांनी संबंधितांना दिल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या पुरेशा सोयी नसल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर व त्यानंतर कृषी पंपावर अवलंबून राहावे लागते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी रात्री अपरात्री शेतामध्ये जावे लागत असे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा रानटी हिंस्त्र पशुंच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. ही बाब आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली व लोडशेडिंग बंद करून दिवसा वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी लावून धरली. त्यांच्या या मागणीला आता यश मिळाले असून आता शेतकऱ्यांना सकाळी ६ ते सायंकाळी ६ या दरम्यान वीज पुरवठा मिळणार आहे त्यांच्या या प्रयत्नांबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे अभिनंदन केले आहे.