दि. २ फेब्रुवारी २०२३
Vidarbha News India - VNI
५०० विद्यार्थिनींमध्ये एकटाच असल्याचे पाहून परीक्षा केंद्रात बेशुद्ध पडला विद्यार्थी!.. अन पुढे ...
विदर्भ न्यूज इंडिया
नालंदा : बिहारमधील नालंदा येथे माध्यमिक परीक्षेदरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. परीक्षेसाठी आलेला विद्यार्थी जवळपास ५०० विद्यार्थिनींमध्ये एकटा असल्याचे पाहून बेशुद्ध पडला.
हे प्रकरण बिहार शरीफ येथील एका परीक्षा केंद्राशी संबंधित आहे, जेव्हा परीक्षा देण्यासाठी आलेला एक विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये एकटा दिसल्याने बेशुद्ध पडला. यानंतर लगेच विद्यार्थ्याला उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार शरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजचा विद्यार्थी मनीष शंकर याचे ब्रिलियंट स्कूलमध्ये माध्यमिक परीक्षेचे केंद्र होते, असे सांगण्यात येते. सकाळी मनीष परीक्षा केंद्रावर गेला असता त्याला त्याच्या परीक्षा केंद्रावर फक्त विद्यार्थिनी असल्याचे दिसले. जवळपास ५०० विद्यार्थिनींमध्ये स्वतःला एकटे असल्याचे पाहून तो अस्वस्थ होऊ लागला. त्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध झाला.
दरम्यान, मुलाची मावशी पुष्पा लता सिन्हा यांनी सांगितले की, केंद्रात जास्त मुली पाहून मनीष घाबरला, त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात न्यावे लागले. बिहारमध्ये बुधवारपासून माध्यमिक परीक्षा सुरू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गृहजिल्ह्यातील नालंदा येथील परीक्षा केंद्राचे दार बंद झाल्यामुळे विद्यार्थिनी आपला जीव धोक्यात घालून परीक्षा केंद्रात प्रवेश करताना दिसून आले.
बिहार बोर्डाची माध्यमिक परीक्षा
बिहार बोर्डची माध्यमिक परीक्षा कालपासून सुरू झाली आहे. १ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. यावर्षी या परीक्षेला ६,३६,४३२ मुली आणि ६,८१,७९५ मुले असे एकूण १३,१८,२२७ विद्यार्थी बसले आहेत. याचबरोबर, यावेळी परीक्षेत काही मोठे बदल करण्यात आले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. बिहार शालेय परीक्षा समिती आणि पोलीस प्रशासनाकडून पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
पाटण्यात ८० परीक्षा केंद्रे स्थापन करणार
पाटणा जिल्ह्यात एकूण ८० परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पाटणा येथे एकूण ४१,५९३ मुली आणि ३८,०४८ मुले बोर्डाची माध्यमिक परीक्षा देतील. यावेळी मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना सहज ओळखता यावे, यासाठी समितीकडून युनिक आयडी जारी करण्यात आल्याचे प्रथमच घडले आहे.