दि. ०२.०६.२०२३
Vidarbha News India
चंद्रपूर : ब्रम्हपुरी जिल्हा मागणीसाठी उपविभागीय कार्यालयावर धडकला भव्य आक्रोश मोर्चा
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : ब्रम्हपुरी जिल्हा व्हावा या मागणीला घेऊन ब्रह्मपुरी तालुका संघर्ष समितीच्या वतीने आज, शुक्रवारी (दि. २ जून) ह्मपुरी येथील अशोक सम्राट चौकातून सकाळी ९ वाजता भव्य आक्रोश मोर्चाला काढण्यात आला.
राज्य शासनाचा नवीन २२ जिल्हे बनवण्याच्या हालचाली सुरू होतात ब्रम्हपुरी जिल्हा बनण्याच्या दृष्टीने सन १९८२ पासुनच पूर्णत:निकषामध्ये बसला आहे. फक्त राजकीय प्रभावाने त्यावेळी ब्रम्हपुरी जिल्हा न बनविता गडचिरोली जिल्हा घोषीत करण्यात आला. तेव्हापासून ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी सातत्याने मागणी होत आहे.
ब्रह्मपुरी शहर हे भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य नगरी म्हणून विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रभर या शहराचा नावलौकिक आहे. ऐतिहासिक, भौगोलिक, शैक्षणिक शहर, आरोग्य नगरी व सर्व बाबी समाविष्ट असणारा हा तालुका आहे. त्यामुळे यापुढे ब्रम्हपुरीच जिल्हा झालाच पाहिजे यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मागील ४० वर्षापूर्वी सन १९८२ पासून येथील जनतेची जिल्हा निर्मितीची मागणी आहे. ब्रम्हपुरी जिल्हा व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. ब्रम्हपुरी चंद्रपूर जिल्ह्याची जुनी तहसिल आहे. पूर्वीपासून जिल्ह्यात चंद्रपूर नंतर ब्रम्हपुरीचा दुसरा क्रमांक लागतो. या प्रकारच्या सोयी सुविधाही ब्रह्मपुरी शहरात उपलब्ध आहेत. भौगोलिक दृष्टीने हा तालुका परिपक्व आहे. महसुलची जागा ब्रम्हपुरी शहराच्या सभोवताल आहे. जिल्ह्यासाठी लागणाऱ्या शासकीय इमारती सुसज्ज आहेत. इतर तालुक्यांपेक्षा या तालुक्याला जिल्हा घोषीत केल्यास अगदी कमी खर्च लागणार असल्याने शासनाने ही बाब अधोरेखीत केली आहे. यापूर्वी ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी सातत्याने अनेक आंदोलने झाली आहेत. जिल्ह्यासाठी कोर्ट, कचेऱ्या नागरिकांनी पाहिल्या आहेत व ब्रम्हपुरी जिल्हा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुध्दा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
तद्वतच ग्रामपंचायत आणि विविध संघटनेच्या माध्यमातून या अगोदर शासनाला पाठविण्यात आले आहेत. ब्रम्हपुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतिमहत्वाचे शहर आहे. मधल्या काळात चिमूर जिल्हा निर्मितीची मागणी करण्यात आली होती. मात्र चिमूर हे ठिकाण फार लांब टप्प्यात येत असल्याने येथे विविध कामकाजासाठी जाण्याकरीता कमालीचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय या उलट ब्रम्हपुरी हे शहर मुख्य राष्ट्रीय महामार्गावर असल्याने सर्वांसाठी सोयीचे होणार आहे. शिवाय रेल्वेची पण सुविधा उपलब्ध आहे. ब्रम्हपुरी येथे नव्याने १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, नगर परिषदेची नवीन इमारत, टोलेजंग प्रशासकीय इमारत, न्यायालयाची प्रशस्त इमारत आदी इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. बस आगार, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे सुविधा आहे. औद्योगिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत व इतर शासकीय उद्योग प्रकल्प उभारण्यासाठी ब्रम्हपुरी परिसरात जवळजवळ ५०० एकर शासकीय जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे आजुबाजुच्या परिसरातील जनतेला शासकीय व इतर कोणत्याही कामकाजाकरीता सोयीचे आहे. ब्रम्हपुरी तालुका हा चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा एक असतानाच सर्वात जुना तालुका आहे. नागभीड, सिंदेवाही हे सध्याचे तालुकेही त्यावेळेस ब्रम्हपुरी तालुक्यात समाविष्ट होते. न्यायालय, तहसिल कार्यालय, उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी ही सर्व कार्यालये त्यावेळेपासून ब्रम्हपुरीत अस्तित्वात आहेत. ब्रम्हपुरी पासून वडसा, कुरखेडा, आरमोरी, नागभीड, कोरची, सिंदेवाही या तालुक्यांची गावे अवघ्या ५० किलोमीटर अंतराच्या आत येत असून चारही बाजुने दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
एक जिल्हा होण्याकरीता लागणारे सर्व शासकीय निकष ब्रम्हपुरीच्याच बाजुने आहेत आणि ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही तरीही जेव्हा जिल्हा निर्मितीचा मुद्दा ऐरणीवर येतो तेव्हा ब्रम्हपुरीकरांवर अन्यायच होत आहे. त्यामुळे आता ब्रम्हपुरीकरांनी जिल्हा निर्मिती होण्याकरीता ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने कंबर कसली असून क्रांतीची मशाल घेऊन आज आक्रोश मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी एसडिओ संदीप भस्के यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे.
तत्पूर्वी स्थानिक ख्रिस्तानंद चौकात चक्काजाम आंदोलन करीत ब्रम्हपुरीकर रस्त्यावर उतरले व ब्रह्मपुरी जिल्हा घेतल्याशिवाय ब्रह्मपुरीकर स्वस्त बसणार नाही अशा घोषणा आंदोलकानी यावेळी आक्रोश मोर्चातून असा इशारा देत होते. यावेळी मोर्चात सहभागी माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रत्यक्ष ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी रेटून धरली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रत्येक पक्षातील राजकीय नेते, ज्येष्ठ नागरिक, एनजीओ, विविध संघटनेतील कार्यकर्ते जवळपास प्रत्येकच ग्रामपंचायत मधील पदाधिकारी व तालुक्यातील आंदोलक युवा वर्ग व नागरिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष रिता उराडे, ॲड.भेंडारकर, प्रा.अतुल देशकर, प्रा.जगनाडे, प्रशांत डांगे, विनोद झोडगे आदींनी मोर्चाला मार्गदर्शन केले.
ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी अधिकच बळकट होईल असे मत जिल्हा संघर्ष समितीच्या निमंत्रक प्रशांत डांगे, विनोद झोडगे, सुरज शेंडे, प्रा.देवदास जगनाडे, अविनाश राऊत, सुधाकर पोपटे, राजू भागवत, दीपक नवघडे, सुरज विखार, राहुल सोनटक्के सुनील विखार, सुरज मेश्राम, ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.