दि. १८.०७.२०२३
Vidarbha News India
Gadchiroli Floods : गडचिरोली जिल्ह्यातील 8 प्रमुख मार्ग बंद, 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; 'गोसीखुर्द'चे 12 दरवाजे बंद!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 8 प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.
जिल्ह्यातील 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
सोमवारी गोसीखुर्द धरणाचे (Gosikhurd Dam) सर्व 33 गेट उघण्यात आले होते. धरणाचा जलसाठा नियंत्रित असल्यानं आज (मंगळवार) सकाळपासून धरणाचे 12 गेट बंद करून आता 21 गेट मधून 85 हजार 764 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहा असे आवाहन केले आहे.
हे 8 प्रमुख मार्ग बंद
दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण (flood hits gadchiroli) झाल्याने 8 प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. गोमनी नाल्याला आलेल्या पुरामुळे अहेरी ते मुलचेरा, खुदरामपल्ली आणि कोपरअल्ली, एटापल्ली नाक्या समोरील मार्ग, बोलेपल्ली मार्ग, पाविमुरंडाच्या जवळील नाल्यावरील मार्ग, चामोर्शी ते माक्केपाली मार्ग, पोटेगाव समोरील मार्ग, आलापल्ली ते भामरागड हा राष्ट्रिय महामार्ग पर्लकोटा नदीच्या पुरामुळे बंद झाला आहे.
भामरागडच्या 60 गावांचा संपर्क तुटला
गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भामरागडलगतच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातील 60 हुन अधिक गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे.
पर्लकोटा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र हे पूल पूर्णत्वास आले नसल्याने जुन्या पुलावर तब्बल चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने भामरागडसह भामरागड पलीकडील 60 हुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
आणखी गावांचा संपर्क तुटण्याची भीती
पोलिसांनी पुलावर बंदोबस्त लावला असून मार्ग बंद झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. आताही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आल्लापल्ली-हेमलकसा हा मार्गही नाल्यांच्या पुरामुळे बंद होण्याची स्थिती निर्माण झाली असून आणखी काही गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
गडचिरोली पालिका कार्यालय पाण्याखाली
गडचिरोली शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गडचिरोली पालिका कार्यालय पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या पालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त केला जात आहे. गडचिरोली शहरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शहरातील अनेक सकल भाग जलमय झाले असून त्यातच शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नगरपरिषद कार्यालयाच्या परिसराला तलावाच्या स्वरूप आले आहे.
पाऊस असाच सुरू राहिल्यास नगरपरिषदेच्या अनेक कक्षांमध्ये पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी सुद्धा गडचिरोली नगरपरिषदेत पाणी शिरले असून नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात पाणी शिरले होते. मात्र दरवर्षी ही परिस्थिती उद्भवत असताना नगरपरिषदेने अद्याप कोणत्याही उपाययोजना केले नसल्याने नगरपरिषद कार्यालय पाण्याखाली जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.