दि. २५.०७.२०२३
Vidarbha News India
तलाठी परीक्षेतून सरकारला 127 कोटींचा महसूल; 4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : राज्यात दोन वर्षापासून रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून तलाठी पदासाठी 4644 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जागांसाठी राज्यभरात तब्बल 13 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.
या परीक्षा शुल्कापोटी सरकारच्या तिजोरीत तब्बल 127 कोटी रुपयांचा महसुल जमा झाल आहे. विशेष म्हणजे, पी.एचडी., इंजिनिअर, एमबीए झालेल्या हजारो उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांनीही अर्ज केले आहेत.
राज्यात 4 वर्षांनंतर तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त मिळाला आहे. सरकारने 4644 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून 26 जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात 23 जुलैपर्यंत सुमारे 13 लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अजून दोन दिवस म्हणजेच 25 जुलैपर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.
यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केल्यास एका जागेसाठी 275 उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झाली, याचे कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच शासनाला ही परीक्षा 20 पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार आहे.
तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. 23 जुलैपर्यंत शासनाकडे 12 लाख 77 हजार 100 अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल 127 कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले आहेत. एवढंच नाही तर हा आकडा येत्या दोन दिवसांत अजून वाढणार आहे.