दि. ०८.०९.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी अभ्यासगट नेमावा; काँग्रेस नेते- वसंत पुरके
Gadhiroli News
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आपली प्रगती झाली नाही किंवा आपण मागे रोहिलो आहोत, असे ज्या ज्या समाजाला वाटते त्या प्रत्येक समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे.
मात्र अशा स्थितीत सत्ताधाऱ्यांनी संविधानिक तरतुदी तपासल्या पाहिजेत. विरोधी पक्षांना सोबत घेऊन अभ्यास गट तयार करून सर्व बाजू तपासून आरक्षण द्यायला हवे, असे राज्याचे माजी शिक्षण मंत्री तथा काँग्रेस नेते वसंत पुरके म्हणाले.
जनसंवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी गडचिरोली येथे आले असता गुरुवार (ता. ७) स्थानिक सर्किट हाऊस विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना पुरके म्हणाले की, सध्याचे सरकार लोकशाहीचा खुन करू बघत आहे.
बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांचे सत्कार होतात, मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाल्यानंतरही पंतप्रधान भाष्य करत नाहीत. महागाई, बेरोजगारी वाढली तरी ब्र काढत नाही. भ्रष्टाचार बोकाळला असूनही नैतिकता, नितीमत्तेचे भान ठेवून त्यांचा कोणताच मंत्री राजीनामा देत नाही.
देशातील लोकशाहीची अशी काळरात्र सुरू असताना राहुल गांधी यांनी केलेली ३५७० किमीची भारत जोडो पदयात्रा किंवा आता पुन्हा सुरू झालेली जनसंवाद पदयात्रा ही ही लोकशाहीचा उष:काल आहे. जिथे एक तडीपार देशाचा गृहमंत्री तिथे आपण कुठे दाद मागणार, मणिपूरसारख्या घटनांवर पंतप्रधान मोदींसह सर्व सत्ताधारी गप्प आहेत.
देशात जातीधर्मात तेढ निर्माण करून दंगली घडविल्या जात आहेत. बेरोजगारी, आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण सत्ताधारी यावर बोलण्याऐवजी नावे बदलण्यात व्यस्त आहे. काही बिनडोक लोक वायफळ बोलून समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहे.
संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांच्या मागे 'ईडी' लावण्यात येत आहे. पत्रकारांना तुरुंगात डांबून लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू आहे. त्यामुळे देशात सत्ताबदल गरजेचा आहे. अशा परिस्थितीत संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेत आहे, असेही पुरके म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार नावदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, डॉ. नामदेव किरसान, विश्वजीत कोवासे आदी नेते उपस्थित होते.
...तेव्हा आमचेच काही लोक मूकदर्शक होते
आपल्या धाराप्रवाही बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले वसंत पुरके यांनी बोलण्याच्या ओघात एक खंतही व्यक्त केली. राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी त्यांना पप्पू ठरवण्यासाठी भाजपने कोट्यवधींची मोहीम राबवली. राहुल गांधी यांची पप्पू म्हणून खिल्ली उडवली जात असताना आमच्याच पक्षाचे काही नेभळट लोक मूकदर्शक बनून होते, असे म्हणत त्यांनी ही खंत व्यक्त केली.