दि. ०८.१२.२०२३
Vidarbha News India
Winter Session : ठेवीदार संरक्षण कायद्यात सुधारणा करणार, गृहमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती.!
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास पार पडला. यावेळी गेल्या महिन्यांत अधिकचे पैसे मिळणार या आमिषातून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर देण्यात आले. आर्थिक लाभाच्या आशेने पैशांची गुंतवणूक केलेल्या आणि फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांची रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यात सुधारणा केली जाईल. ही सुधारणा नेमकी काय असावी यासंदर्भात अभ्यासगट नेमून तीन महिन्यांत अहवाल घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. (Winter Session: The Depositor Protection Act will be amended, Home Minister Devendra Fadnavis informed in House)
विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी उरण तालुक्यातील (जि . रायगड) पिरकोन येथे रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी या प्रकरणात गुंतवणुकदारांची 39 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याची माहिती दिली. यासंदर्भात सत्र न्यायालयाने आरोपीला दिलेला जामिन पोलिसांनी रद्द करून घेतला आहे. आरोपीकडून 9 कोटी रुपयांची रोख रक्कम, बँक खात्यातील 10 कोटी रूपये आणि दीड कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
जप्त केलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची कारवाई सुरू केली जाईल. त्यासाठी पुढील तीन महिन्यात सक्षम प्राधिकारी नेमला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्यावेळी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी मालमत्तेचा लिलाव करून पैसे वसुलीची प्रक्रिया वेळखाऊ असून यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची आणि हा गुन्हा अजामिनपात्र करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी महाराष्ट्र संरक्षण ठेवीदार कायद्यात सुधारणा करण्यासाठी अभ्यासगट नेमला जाणार असल्याचे घोषित केले.
तसेच, गुंतवणूकदारांनी जाहिरातीला भुलून आपली फसवणूक करून घेऊ नये यासाठी आर्थिक गुन्हे विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी जनतेने सावध राहून गुंतवणूक करावी. दुप्पट पैशांचे आणि जास्त व्याजाचे आमिष दाखविणाऱ्या वित्त कंपन्यांपासून सावध राहावे, असे आवाहन फडणवीस यांच्याकडून करण्यात आले. तर लोकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी जनजागृती केली जाईल, असेही फडणवीसांनी सभागृहास सांगितले. यावेळी काँग्रेसच्या नाना पटोले, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे गटाचे रवींद्र वायकर आदींनी उपप्रश्न विचारले.