दि. 31.01.2024
Vidarbha News India
Gadchiroli : आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गासह प्रत्येक गावाला रस्ते जोडा, - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात तीन राज्यांना जोडणारा आलापल्ली ते सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग त्वरित पूर्ण करण्यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक गाव रस्त्याची जोडण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्याची प्रलंबित कामे यासोबतच मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्ग याच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी या संदर्भात झालेल्या बैठकीत गडचिरोलीचे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आक्रमक भूमिका मांडत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ,राष्ट्रीय महामार्ग आणि विविध योजनांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या व नियोजित रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगिरी शासकीय निवासस्थानी गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा आज आढावा घेतला त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संजय मिना यांनी यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या काम विषयी सादरीकरण केले. यावेळी तीन राज्यांना जोडणाऱ्या सिरोंचा आलापल्ली या शंभर किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर चर्चा झाली. या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी सात मीटर वरून दहा मीटर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाच्या मुंबईतील मुख्यालयात प्रलंबित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कुठल्या परिस्थिती महामार्ग दहा मीटर रुंदीचा होणार त्यासाठी पाठपुरावा करणार असल्यान प्रशासनाने यासंदर्भात तयारी ठेवावी असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. शिरोंचा आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग महत्त्वपूर्ण असून त्याच्या बांधकामात कुठलाही गावीलपणा नको हा महामार्ग त्वरित पूर्ण करून जनतेसाठी उपलब्ध करून द्यावा, असे स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रशासकीय यंत्रणेला दिले गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागातील रस्ते क्षतिग्रस्त झाले आहेत. या रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल व या गावांमध्ये दळणवळणाच्या सेवा पूर्ववत होतील यादृष्टीने कामे करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या.
जिल्ह्यामध्ये 'मिनरल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर' अंतर्गत येणाऱ्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली. या कामांसाठी आवश्यक जमीन अधिग्रहनाची कामे पूर्ण करून कामांना गती देण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रकल्पांतर्गत नवेगाव मोरे ,हैदरी, आलापल्ली बायपास, वडाळा पेठ, येलची आदी रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली
राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यातील एकूण 552 किमी ची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये आलापल्ली -भामरागड- लाहेरी आदी संवेदनशील भागातील रस्त्यांनी जवळपास ११२ कि.मी.च्या रस्त्यांची कामे तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. या कामांना आवश्यक मंजुरी घेण्यासाठी राज्य शासनाच्या वर्ष २०१७ मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचा आधार घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बिरसा मुंडा योजनेतून जिल्ह्यातील वाड्या, पाडे मुख्य गावांना जोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या २१३ कि.मी. रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव दुरुस्त करून शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्ह्यातील रस्त्यांच्या ज्या कामांना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी घ्यावयाची आहे अशा कामांचा आपण स्वतः पाठपुरावा करून हे विषय मार्गी लावू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातील सध्या बांधकाम सुरू असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या बांधकामाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर या कामांना आता गती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.