गोंडवाना विद्यापीठात 'साहित्यिक आपल्या भेटीला' उपक्रमाच्या व्याख्यानमाला कार्यक्रम संपन्न
साहित्य केवळ वाचायचे नसते तर ते ह्रदयात उतरवायचे असते ; पुनित मातकर
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : एखाद्या ओवी मधून आपलं आयुष्य बदलू शकतं, आनंद यादव यांचे अनेक साहित्य मी वाचलय. साहित्याने मला जगाकडे बघण्याची परिपक्व दृष्टी प्रदान केली. साहित्य वाचताना आपल्या आत दडलेल्या बीजांना अंकुर फुठायला लागतात. पुस्तकांनी मला घडवले. जेव्हा कुणी नसते तेव्हा हे साहित्य आपल्या सोबत असतं भाषेचा, आपल्या अस्तित्वाचा न्युनगंड असेल तर त्याला साहित्य सावरतं आणि हा न्युनगंड दूर करता येईल. चांगलं बोलण्यासाठी, चांगला वाचन पाहिजे.
साहित्य केवळ वाचायचे नसते तर ते हृदयात उतरवायचे असते. अशा भावना व्यक्त करत,' साहित्य आणि जीवन द्रुष्टी' यावर त्यांनी प्रकाश टाकला.
गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागातर्फे 'साहित्यिक आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन 'साहित्य आणि जीवन द्रुष्टी' या विषयावर आज करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली, अधिव्याख्याता तसेच प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक पुनित मातकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे यांची उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, मराठी ही आपली बोलीभाषा आहे तसेच ती आपल्या कलेची आणि साहित्याची भाषा आहे. या भाषेला जगामध्ये तोड नाही अशाही मराठी भाषा. या भाषेतील साहित्य प्राध्यापकांनी शिकवल्या नंतर विद्यार्थ्यांना त्याचे किती आकलन झाले महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्याचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण आहे. विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळाली तर मराठीत साहित्य निर्मिती होईल. असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कवी, साहित्यिक पुनित मातकर यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. पुनित मातकर यांचा परिचय वाचन सविता गोविंदवार, प्रास्ताविक पुंडलिक शेंडे, संचालन शुभम बुटले तर आभार प्रियंका बगमारे यांनी मानले. यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.