दि. २ जुलै २०२३
Vidarbha News India
गडचिरोली : स्वातंत्र्यानंतरही येडसिली वासीयांची पायवाटच!
विदर्भ न्यूज इंडिया
Yedsili residents
गडचिरोली/ सिरोंचा - तालुक्यातील आदिवासीबहुल, अतिदुर्गम भागात वसलेल्या येडसिली येथे मागील 30 वर्षांपासून रापमची बससेवा पोहोचली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. परिणामी मागील अनेक वर्षांपासून या गावासह परिसरातील नागरिकांना पायीच गाव गाठावे लागत आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. मात्र, निगरगट्ट प्रशासन व उदासीन लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे येथील समस्या अद्यापही सुटलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांमधून शासकीय यंत्रणेप्रती तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासन, प्रशासन गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागाचा विकास करण्याचा दावा करीत असले तरी वास्तव वेगळेच आहे.
जिल्हा निर्मितीच्या साडेतीन दशकानंतरही दुर्गम भागात विकासाची गंगा पोहोचलेली नाही. या भागातील नागरिकांना वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या मुलभूत सोयीसुविधांपासून आजही वंचित राहावे लागत आहे. नदी, नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात तर या भागातील नागरिकांचा तीन महिने जगाशी संपर्क तुटत असल्याचे भीषण वास्तव आहे. Yedsili residents तत्कालीन सिरोंचा विधानसभा क्षेत्राचे आमदार पेंटाराम तलांडी यांनी दुर्गम भागात बससाठी पुढाकार घेतला होता. 1980 ते 1985 या कालावधीत सिरोंचा-आसरअल्ली-सोमनपल्ली-कोपेला-झिंगानूर-येडसिली मार्गावरुन देचलीपेठा बससेवा सुरु होती. मात्र, त्यानंतर या दुर्गम भागातील बससेवा पूर्णत: बंद झाली. झिंगानूरपासून येडसिली 9 किमी, लोहा 11 किमी व कड्डे 13 किमी अंतरावर आहे. या गावातील लोकांना दररोज विविध कामासाठी झिंगानूर येथे जावे लागते. मात्र, या मार्गावर पडणारे तीन नाले ओलांडून झिंगानूर तसेच सिरोंचा तालुका मुख्यालय गाठावे लागत आहे.
1981 मधील हातपंप अद्यापही सुरुचतत्कालीन आमदार पेंटारामा तलांडी यांच्या कार्यकाळात येडसिली गावात 1981 मध्ये बसविलेले हातपंप आजही सुस्थितीत सुरु आहे. मात्र दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील दुर्गम भागात लावलेले हातपंप बंद अवस्थेत आहेत. या गावात अजूनपर्यंत वीज तसेच मुलभूत सुविधा पोहोचल्या नसल्याने आधुनिक काळाही या गावातील नागरिकांना पारतंत्र्याचे जीवन जगावे लागत आहे.