दि. २९.०९.२०२३
Vidarbha News India
Bacchu Kadu News : अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या बच्चू कडूंनी गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांचे केले तोंडभरून कौतुक !
Gadchiroli District Political News :विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : माजी राज्यमंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्हा आहे. येथील मागासलेपण अद्यापही दूर झाले नाही. पण जिल्हा प्रशासन मात्र अतिशय प्रभावीपणे काम करत आहे. अनेक संवेदनशील अधिकारी या जिल्ह्याला लाभल्याने जिल्ह्याच्या विकासाकरिता मोठा फायदा होत आहे. बच्चू कडू यांच्याकडे सध्या दिव्यांग महामंडळाचे अध्यक्षपद आहे. त्यासाठी ते राज्यभर 'दिव्यांगांच्या दारी' हा उपक्रम राबवत आहेत.
'दिव्यांगांच्या दारी' या उपक्रमाअंतर्गत गडचिरोलीच्या कार्यक्रमाला बच्चू कडूंनी नुकतीच हजेरी लावली. नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्हा हा अतिशय मागासलेला आहे. पण येथील जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन अतिशय प्रभावीपणे काम करीत आहे. ग्रामीण भागातील काही कामचुकार कर्मचारी सोडले तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज जिल्ह्याच्या विकासासाठी सतत झटत आहे.
शासनाच्या विविध योजना राबविताना त्या कशा यशस्वी होतील, यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस प्रशासनाच्या अलर्ट झोनमुळे नक्षली कारवाया कमालीच्या मंदावल्या आहेत. अनेक नक्षली आत्मसमर्पण करीत आहेत. दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी 'दिव्यांग्याचा दारी' हा उपक्रम राबविला जात आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात गडचिरोली जिल्हा अग्रेसर आहे.
राज्यभर राबवावा गडचिरोली पॅटर्न !
अशावेळी दिव्यांग बांधवांचे उत्तम पुनर्वसन येथील अधिकारी करतील, असा आशावाद बच्चू कडू यांनी व्यक्त केला. गडचिरोलीकडे पाहून राज्यात हा पॅटर्न लागू करण्याकरिता अधिकाऱ्यांनी तत्पर असावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मिना, मुख्य कार्यपालन अधिकारी आयुशी सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, सहायक आयुक्त सचिन मडावी आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात २१ हजार दिव्यांग बांधव आहेत. ग्रामीण भागात दिव्यांग्यांची संख्या ८० टक्क्यांहून अधिक आहे. अशावेळी त्यांच्याकरिता असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. दिव्यांगांकरिता यूआयडी कार्डचे शंभर टक्के वाटप करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दिली.
दिव्यांगांकरिता सातत्याने आवाज उठविणाऱ्यां बच्चू कडू यांच्यामुळेच शासनाने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले. त्यांच्याकरिता स्वतंत्र मंत्रालय झाल्याने दिव्यांग्यांच्या कल्याणासाठी मोठी मदत होत आहे. दिव्यांगांकरिता जिल्हा प्रशासन तर काम करत आहेच. पण पोलिस प्रशासनही दिव्यांग्यांच्या मदतीसाठी सरसावले असल्याची माहिती या वेळी आमदार कृष्णा गजबे यांनी दिली.
गडचिरोलीत 'दिव्यांग्यांच्या दारी' या उपक्रमासाठी बच्चू कडू आले होते. या कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव आले होते. आमदार कडू यांनी त्यांची विचारपूस केली. कसे काय चालले आहे, असे विचारत आपुलकी दाखविली. या वेळी काही दिव्यांगांना योजनांचा लाभ देण्यात आला.