दि. २५.०८.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : बसचे संतुलन बिघडले अन् चालक सावध झाले; सतर्कतेमुळे ३० प्रवासी बचावले !
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : सुरक्षित प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्रवासी पसंती देतात. परंतु महामंडळाच्या बहुतांश बसेस भंगार झाल्या आहेत. अहेरी आगारातही हीच स्थिती दिसून येते.
येथील अनेक बसेस भंगार असतानाही त्या दुर्गम भागात सोडल्या जात आहेत.
२४ ऑगस्ट रोजी अहेरी तालुक्यात एका बसेसचे एक चाक निखळण्यापासून बचावले. बसचे संतुलन बिघडत असल्याची बाब चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने बस थांबवली व ३० प्रवासी अपघातापासून बचावले. सिरोंचावरून अहेरीकडे एमएच ०७ सी ९४६४ क्रमांकाची एसटी महामंडळाची बस जात असताना जिमलगट्टा जवळच्या टी-पॉइंटजवळ दुपारी १ वाजता बसच्या मागील उजव्या बाजूचे एक चाक निखळत होते.
चाकाला असलेल्या एकूण ८ नटबोल्टपैकी येथील ५ नटबोल्ट निखळले. त्यामुळे चाक लहरत होते. स्टेअरिंगद्वारे चालकाच्या लक्षात ही बाब आली. बस पंक्चर झाली तर नाही, ना अशी शंका आल्यानंतर चालकाने बस थांबवून पाहणी केली असता चाकाचे आठपैकी पाच नटबोल्ट पूर्णत: निघाल्याचे दिसून आले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे बस वेळीच थांबविल्याने दुर्घटना टळली.
नटबोल्टचा अभाव
नटबोल्ट निखळलेल्या बसमध्ये पर्यायी नटबोल्ट नव्हते. त्यामुळे दुसरीकडून नटबोल्ट आणण्यासाठी चालक व वाहक गेले होते. त्यामुळे प्रवाशांना दीड ते दोन तास रस्तावर ताटकळत राहावे लागले. बसमध्ये किरकाळ वस्तू असणे आवश्यक आहेत. त्या राहत नाही. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडतात.