दि. 5 एप्रिल 2024
Vidarbha News Indiaगडचिरोली जिल्हा राज्यातून विकसित जिल्हा म्हणून ओळखेल ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा राज्यातील सर्वात श्रीमंत आणि विकसित जिल्हा म्हणून उदयास येईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, पूल, रेल्वे व उद्योग यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दिला असून गडचिरोली आता विकासाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
गडचिरोली जिल्हा हा पुढील 10 वर्षात विकासाचे अनेक पल्ले गाठताना दिसेल. वडसा-गडचिरोली रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच वडसा-नागपूर अशी मेट्रो देखील सुरू करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. गडचिरोलीच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना निवडून द्या, असे आवाहनही गडकरी यांनी जाहीर सभेतून केले.
भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी देसाईगंज येथे आज, 5 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर उमेदवार अशोक नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार कृष्णा गजबे, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजप नेते मोती कुकरेजा, किसन नागदेवे, राजू जेठाणी, चांगदेव फाये, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत जंबेवार, संजय गजपुरे, लिलाधर भरडकर आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना गडकरी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी नेतेंनी आपल्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे आणि रस्त्यांच्या कामासाठी अनेकदा त्यांनी शासनाकडे निधीची मागणी केली आणि गडचिरोलीच्या विकासासाठी हातभार लावला आहे. त्यामुळे त्यांना निवडून देणे म्हणजे विकासाला मत देणे होय. यावेळी बोलताना सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी नितीन गडकरी यांनी रेल्वेचा प्रश्न सोडविण्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करुन गडचिरोलीची जनता गडकरी यांना विसरणार नसल्याचे म्हटले. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार कृष्णा गजबे यांनी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना भरघोष मतांनी निवडून देण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले.